Ecclesiastes 8

1ज्ञानी मनुष्य कोण आहे?
जीवनात काय घटना घडणार आहे हे कोणाला समजते?
मनुष्यातील ज्ञान त्याचे मुख प्रकाशीत करते
आणि त्याच्या मुखाचा कठीणपणा बदलतो.

राजाच्या आज्ञा पाळ

2मी तुम्हाला सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याच्या संरक्षणाची तू देवाची शपथ घेतली आहे. 3त्याच्या समोरून जाण्याची घाई करू नको आणि जे काही चुकीचे आहे त्याला पाठींबा देऊ नको. कारण राजाच्या इच्छेला येईल तसे तो करतो. 4राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्याला कोण म्हणेल, तू काय करतो?


5जो राजाच्या आज्ञा पाळतो तो अनिष्ट टाळतो.

शहाण्या माणसाचे मन योग्य वेळ व न्यायसमय समजते.

देवाचे मार्ग मानवी ज्ञानाला अगम्य

6प्रत्येक गोष्टीला योग्य उत्तर मिळण्याचा आणि प्रतिक्रिया दर्शविण्याचा समय आहे.
कारण माणसाच्या अडचणी मोठ्या आहेत.
7पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाही.
काय होणार आहे हे त्याला कोण सांगू शकेल?

8जीवनाच्या श्वासाला थांबून धरण्याचा अधिकार कोणालाही नाही

आणि कोणालाही त्याच्या मरणाच्या दिवसावर अधिकार नाही.
युध्द चालू असताना कोणाचीही सैन्यातून सुटका होत नाही,
आणि दुष्टाई त्याच्या दासाला सोडवणार नाही.
9मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि कोणतेही काम जे भूतलावर करण्यात येत आहे त्याकडे मी आपले लक्ष लावले आहे. एक समय आहे त्यामध्ये दुसरा मनुष्य आपल्या वाईटासाठी दुसऱ्यावर अधिकार करतो.

10मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हेसुद्धा निरुपयोगी आहे. 11जेव्हा वाईट गुन्ह्याबद्दल शिक्षेचा हुकूम होऊनही ती लवकर अंमलात आणली जात नाही. त्यामुळे मानवजातीचे मन वाईट करण्याकडे तत्पर असते.

12पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरीही तो भरपूर आयुष्य जगला. असे असले तरी मला माहित आहे जे देवाचा सन्मान करतात, जे त्याच्यासमक्ष त्याला मान देतात हे अधिक चांगले आहे. 13पण दुष्टाचे हित होणार नाही. त्याला दीर्घायुष्य लाभणार नाही. त्यांचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो देवाला मान देत नाही.

14पृथ्वीवर आणखी एक निरर्थक गोष्ट घडते, असे काही नीतिमान असतात की, दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते आणि असे काही दुष्ट असतात की, नीतिमानाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती यांची होते. मी हे म्हणतो हेही व्यर्थ आहे. 15मग मी आनंदाची शिफारस केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे व आनंद करावा यापेक्षा सूर्याच्या खालती त्याला काही उत्तम नाही. कारण त्याच्या आयुष्याचे जे दिवस देवाने त्याला पृथ्वीवर दिले आहेत त्यामध्ये त्याच्या श्रमामध्ये हे त्याच्याजवळ राहील.

16जेव्हा ज्ञान समजायला आणि जे कार्य पृथ्वीवर चालले आहे ते पाहायला जेव्हा मी आपले मन लावले. कारण अहोरात्र ज्याच्या डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात. तेव्हा देवाचे सर्व काम पाहून मला समजले की, जे काम भूतलावर करण्यात येत आहे ते मनुष्याला पुरते शोधून काढता येत नाही, कारण ते शोधून काढायला जरी मनुष्याने कितीही श्रम केले तरी ते त्याला सापडणार नाही आणि याव्यतिरिक्त, कोणी ज्ञानी मनुष्याने, मी ते जाणीन, असे जरी म्हटले, तरी त्याला ते सापडणार नाही.

17

Copyright information for MarULB